रविवार, २८ ऑक्टोबर, २०१२

मनु हे जातीसंस्थेचे निर्माते नव्हेत

http://navshakti.co.in/aisee-akshare/91740/?fb_action_ids=133156863498419&fb_action_types=og.likes&fb_source=other_multiline&action_object_map=%7B%22133156863498419%22%3A412293782169628%7D&action_type_map=%7B%22133156863498419%22%3A%22og.likes%22%7D&action_ref_map=%5B%5D



मनु हे जातीसंस्थेचे निर्माते नव्हेत

कुटुंबसमूह हा विवाहसंस्थेखेरीज अस्तित्वात येवू शकत नाही हे उघड आहे. प्रारंभिक विवाहसंस्थाही सैल होती. म्हणजे पती-पत्नी नात्यातील आज अभिप्रेत असणारे पावित्—य व मांगल्य त्यात अभिप्रेत नव्हते. जातीसंस्थेचे मुख्य स्वरुप म्हणजे जातीअंतर्गत होणारे विवाह. जातीअंतर्गत विवाह झाल्याने जातीचा संख्यात्मक विस्तार होणे स्वाभाविकही आहे. परंतु  आधी जाती आल्या कि जातीअंतर्गत विवाह आले हा महत्वाचा प्रश्न आहे.
जातीसंस्था धर्मसंस्थेने बनवलेल्या नाहीत. धर्माचा जन्माधारीत अर्थव्यवस्थेला पाठिंबा नाही. डा. बाबासाहेब आंबेडकरांनीही आपल्या उ डढएड खछ खछऊख ः ढहशळी चशलहरपळा, ऋशपशीळी रपव ऊशvशश्रेािशपीं या कोलंबिया विद्यापीठात 1916 साली सादर केलेल्या प्रबंधातही मनु अथवा ब्राह्मण हे जातीव्यवस्थेचे निर्माते नव्हेत हे ठामपणे सिद्ध केले आहे. आपण जातींत पुरातन काळापासुन भर पडत कशी गेली, दहव्या शतकापर्यंत तरी जातीबदलही कसा घडत होता याबाबतही थोडक्यात चर्चा केलेली आहे. ब्राह्मणांची आधी बंदिस्त जात बनली म्हणून अनुकरणतून अन्य समाजानेही बंदिस्त जातीव्यवस्था स्वीकारली हेही मान्य करता येत नाही. ब्राह्मणांनी आपली जात बंदिस्त का केली याचे उत्तर त्यातून मिळत नाही.
आपण आता जन्माधारित जातीव्यवस्था कशी अस्तित्वात आली यावर स्वतंत्रपणे विचार करणे अत्यावश्यक आहे. त्याशिवाय जातीसंस्थेच्या अपरिवर्तनीय रुपाची निर्मिती कशी झाली याचा उलगडा होणार नाही.
येथे आपल्याला खालील मुद्द्यांवर व तदनुषंगिक निर्माण होणा-या मुद्द्यांवर आता आपण चर्चा करुयात.
1. जातिव्यवस्था विवाहसंस्थाप्रणित?ः मानवी जीवनात आदिम काळी विवाहसंस्थेचे अस्तित्व नव्हते. एका अर्थाने मनुष्य पशुधर्म पाळत होता. म्हणजे नाती-गोती अद्याप निर्माणच झालेली नव्हती. भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास या महत्वपुर्ण प्रबंधात वि.का. राजवाडेंनी आदि यज्ञधर्मही सामुदायिक शरीरसंबंधांना सोय पुरवण्यासाठी कसा निर्माण झाला याबाबत साधार विवेचन केले आहे. मानवी जीवन प्रजावृद्धीसाठी मुक्त लैंगिक संबंधांना महत्व देत होते. श्वेतकेतुने ही पशुधर्मीय चाल बंद पाडली व आद्य विवाहसंस्थेचा पुरस्कार केला असे आपल्याला महाभारतातील वनपर्वात समजते. कुटुंबसमुहांची, नात्यांची एकूण गोळाबेरीज म्हणजे जात… हे डॉ. इरावती कर्वेंचे विधान आपण मागे पाहिले आहेच. कुटुंबसमूह हा विवाहसंस्थेखेरीज अस्तित्वात येवू शकत नाही हे उघड आहे. प्रारंभिक विवाहसंस्थाही सैल होती. म्हणजे पती-पत्नी नात्यातील आज अभिप्रेत असणारे पावित्—य व मांगल्य त्यात अभिप्रेत नव्हते. पतीच्या संमतीने पत्नी परपुरुषाकडे अथवा अतिथीकडे जावू शकत होती. बाह्य संबंधापासून प्राप्त झालेली संतती पतीचीच समजली जात असल्याने समाजजीवनातही कोणती अडचण उपस्थित होत नव्हती.
 याचाच एक अर्थ असा आहे कि आज आपण समजतो कि आपण कोणी शुद्ध रक्ताचे, वर्णाचे अथवा जातीचे आहोत, त्याला इतिहासाचा आधार नाही….कारण मुळात लैंगिक संबंध हे मुक्त व नंतर अर्धमुक्त झालेले दिसतात. वैवाहिक बंधने आली ती इसपू 1500 च्या आसपास. ही बंधने येण्याचे कारण म्हणजे माणसाने केलेली तत्वज्ञानात्मक प्रगती. आश्वलायन गूह्यसूत्र म्हणते आपण विवाहबद्ध होवून प्रजा उत्पन्न करु. एकमेकांचे प्रेम प्राप्त करुन एकमेकांना आवडते होवूयात. एकमेकांविषयी शुद्ध मन ठेवून शंभर वर्ष जगुयात. (आश्व. गु.सू. 1.7.3.22) याचा अर्थ असा कि प्रजावृद्धी हे विवाहाचे मूख्य ध्येय कायम राहिले तरी प्रेम आणि कर्तव्याची भावना विवाहविधीमध्ये आणली गेली. या काळात विवाह वर्णनिहाय अथवा जातीनिहाय होत असल्याचे पुरावे नाहीत. याचे कारण म्हणजे दोन्ही विभिन्न धर्मधारांत वर्णव्यवस्था व जातीव्यवस्था सैल अशीच होती.
पुढे धर्मशास्त्रज्ञांनी सपिंड व सगोत्र विवाहाचा निषेध सुरु केला. खरे तर ही परिवारबाह्य पण जाती/वर्णांतर्गतची विवाहपद्धती. परंतु प्रत्यक्षात भारतीय समाजात मोठय़ा प्रमाणावर सगोत्र/सपिंड विवाह काही बंधने पाळत कायम राहिले. बहुतेक जातींत आते-मामे भावंडांच्या विवाहाची प्रथा प्रचलित आहे. सगोत्र विवाहही कायदेमान्य आहेत.
जातीसंस्थेचे मुख्य स्वरुप म्हणजे जातीअंतर्गत होणारे विवाह. जातीअंतर्गत विवाह झाल्याने जातीचा संख्यात्मक विस्तार होणे स्वाभाविकही आहे. परंतु  आधी जाती आल्या कि जातीअंतर्गत विवाह आले हा महत्वाचा प्रश्न आहे.
कोणतातरी व्यवसाय असणे हे जातीचे प्रमुख लक्षण आहे, परंतु व्यवसाय बदलला अथवा नवीन व्यवसाय बनवला कि जातही बदलणार हे उघड आहे. अशा परिस्थितीत समव्यवसायी लोकांचे भावनिक अथवा स्पर्धात्मक संम्मिलिनीकरण होणे स्वाभाविक आहे. लहानपणापासून एखाद्या विशिष्ट व्यवसाय वातावरणात वाढलेल्या मुलींना पैतृक व्यवसायाचे किमान प्राथमिक शिक्षण अथवा ज्ञान मिळणे हीसुद्धा स्वाभाविक बाब आहे. अशा स्थितीत लोहाराचे काम करणार्याची मुलगी समजा कुंभारकाम करनार्याच्या घरी दिली तर कुंभारासाठी ती मुलगी वंशवृद्धीच्या कामाखेरीज अनुपयुक्त अशीच आहे. आपण आजही ग्रामीणभागातील श्रमविभागणीचे तत्व पाहिले तर मला काय म्हणायचे ते लक्षात येईल. स्त्री ही फक्त वंशवृद्धीसाठी नव्हे तर एक मोफत श्रम पुरवणारी व्यक्ति एवढे स्त्रीचे अवमूलन होत गेले होते. याला अर्थात आर्थिक कारणे आहेतच. लोहाराची स्त्री, लहानपणापासुन माहिती असल्याने, कोळसा जमा करणे, पेटवणे ते भाता चालवणे व फुटकळ लोहारकामही स्वतःच करण्यात तरबेज असल्याने नवीन प्रशिक्षणाचीही आवश्यकता रहात नाही. हेच तेली-कोष्टीं-ब्राह्मणांबद्दल म्हणता येईल.
त्यामुळे समव्यावसायिकांत विवाह करणे हे फायद्याचे होते. सोयीचे होते. एक फुकटचा कामगार मिळत होता. वंशवृद्धीची सोयही होत होती. मग अशा कुटुंबात मुलगी देणे व अशाच समव्यवसायी कुटुंबातील मुलगी करुन घेणे या देवाणघेवाणीतून ती पुढे प्रथा बनत गेली. या प्रथेतून जन्माधारित जातीव्यवस्था निर्माण होण्यास, सर्वस्वी नसला तरी, हातभार लागला असेही आपल्याला म्हणता येते.
ब्राह्मणांनी आधी आपली जात बंदिस्त केल्याने अन्य समुहांनीही आपापल्या जाती बंदिस्त केल्या अथवा इतरांनी त्यांच्यात प्रवेशण्याचा दरवाजा बंद केल्याने जातेसंस्था बळकट बनली हे बाबासाहेबांचे उपरोल्लिखित प्रबंधातील मत विनम्रपूर्वक अमान्य करावे लागते. व्यावहारिक सोय हे समानव्यवसायींतर्गत विवाहाचे प्रमुख कारण आहे व ती पुढे जसजशी अधिक व्यवसायांची निर्मितीच थांबली तसतशी घट्ट होत गेली असे आपण ठामपणे म्हणू शकतो. भारतात दहाव्या शतकानंतर नवीन व्यवसायांची निर्मिती झाली नाही. म्हणजे कोणताही नवीन जीवनोपयोगी शोध लागला नाही. त्यामुळे नवीन जात निर्माण होण्याच्या शक्यता नव्हत्या. दहाव्या शतकानंतर महाराष्ट्रात दोनच जाती उदयाला आल्या व त्या म्हणजे मराठा व अक्करमाशे कुणबी/मराठा. त्यांच्या उदयाची कारणे सरंजामदारी व स्त्री-शोषण व्यवस्थेत आहेत.
2. जातिव्यवस्था कुलाचारप्रणित?ः हिंदू धर्मातील प्रत्येक जात ही जवळपास एका स्वतंत्र धर्मासारखीच असते हे आपण जातीच्या बंदिस्त व्युहावरुन समजू शकतो. हिंदुधर्म म्हणजे विविध जातींचा एक महासंघ आहे असे म्हटले तरी वावगे ठरू नये. प्रत्येक जातीचेच नव्हे तर पोटजातीचेही कुलाचार हे स्वतंत्र आहेत. कुलाचार ही पुरातन जमातींची उपज आहे. कुल म्हणजे जमात असेही म्हणता येते. पुरातन काळी मुलगी वराला नव्हे तर कुलाला दिली जात असे व कुलपती (जमातप्रमुख) हा वधुवर आपला पहिला हक्क गाजवत असे. कुलवधु हा शब्द या प्रथेचा निदर्शक आहे. प्रत्येक कुलाचे आचार भिन्न असतात. म्हणजे व्यापक परिप्रेक्षात मुख्य दैवते (कुलदैवते) अन्य जातींप्रमाणे समान असली तरीही स्वकुळाचे विशिष्ट अंश एका कुलाला दुसर्या कुलापासून विभक्त करतात.
पण जातिव्यवस्था जन्माधिष्ठित होण्याचा कुलाचाराशी संबंध दिसत नाही. परंतु प्राचिन काळी विभिन्न कुलांत विवाह होत होते, व कुल उच्च कि कनिष्ठ हे ठरवण्याच्या पद्धती सर्वस्वी धार्मिक आधारावर होत्या, व्यवसायांशी त्याचा संबंध नव्हता. याचाच दुसरा अर्थ असा कि जमातींपासून जाती बनल्या हे डॉ. इरावती कर्वे यांचे मत टिकत नाही हेही स्पष्ट होते. उलट जमातींतर्गत विवाह होत असल्याने एकही जमात शुद्ध स्वरुपाची राहिली असेही म्हणता येत नाही.
3. जातीव्यवस्था अर्थसंस्थाप्रणित?ः कोणताही समाज असो अथवा राज्यसंस्था असो, अर्थव्यवस्था हा समाजाचा मुलभूत कणा असतो. अर्थव्यवस्थेमुळेच समाजात वर्गव्यवस्था अस्तित्वात येते. अर्थव्यवस्था कोणत्याही प्रकारची असो, वर्गहीन समाज निर्मण करणे हे मानवाचे स्वप्न अद्याप  साकार झालेले नाही व कदाचित होणारही नाही.
अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने उत्पादनावर आधारीत असते. शेती, खनीजे, वस्तु, वास्तु इ. उत्पादने तसेच रक्षण, व्यापार या सेवामिळून अर्थव्यवस्थेची एक चौकट निर्माण होते. आपण भारतीय अर्थव्यवस्थेच्या प्राचीन ते मध्ययुगीन स्वरुपावर एक ओझरती नजर टाकली कि आपल्या लक्षात येते कि सनपूर्व 5000 पासून  दहाव्या शतकापर्यंत अर्थव्यवस्थेचा चढता आलेख आहे. सिंधु संस्कृतीत मीठ, धान्य, अलंकार, लाकडी इ. वस्तुंचे प्रमाण मुबलक होते. परंतु असे असले तरी व्यवसायांची संख्या मर्यादित असून शेती हाच मुख्य व्यवसाय होता. पुढे जसजसे नवे शोध लागले तसे वस्त्र, लोह-ताम्रजन्य वस्तुंचेही उत्पादन वाढू लागले. प्रारंभकाळी असे उत्पादक अत्यल्प असणार हे उघड आहे. परंतु जसजशी मागणी वाढत जाते तसतशी त्या व्यवसायात अधिक व्यक्तींची आवश्यकता भासू लागते. नवीन शोध लागला कि पुन्हा तसेच आवर्तन सुरु होते. अशा रितीने व्यवसायसंस्था विविधांगी वाढु लागतात. एकाच व्यवसायात वेगवेगळी कौशल्ये निर्माण झाली कि त्यांचेही स्वतंत्र समुह बनत जातात. हे एकाच वेळीस थोडय़ाफार अंतराने देशभर घडत जाते. फक्त मीठाची वाहतुक करणारे लमाण बनतात तर फक्त अन्नधान्याची वाहतूक करण्यात व व्यापार करण्यात कौशल्य मिळवतात ते वंजारी, बंजारा बनतात. परंतु निषिद्ध प्रवेशाची पाटी लागलेली नसते. आता याचा जातीसंस्था जन्माधरित होण्याशी काय संबंध असा प्रश्न वाचकांना पडु शकेल. त्यावर आपण पुढील भागात विवेचन करुयात.
जातीसंस्थेचा इतिहास (3)
संजय सोनवणी  29/10/12

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा